रविवार, २४ जानेवारी, २०१६

---|| फलटण संस्थान ||---

मुंबई, सातारा जिल्ह्यांतील एक जहागीर. येथील जाहागीरदाराचें आडनांव निंबाळकर. मुख्य गांव फलटण. जहागिरीच्या उत्तरेस नीरा; पूर्वेस सोलापूर जिल्हा; दक्षिणेस माण, व खटाव तालुके; पश्चिमेस वाई व कोरेगांव हे तालुके. एकदंर गांवे ७२ आहेत क्षेत्रफळ ३९७ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) ५५९६६. उत्पन्न २ लाख रु. इंग्रज सरकारास ९६०० रु. खंडणी जाते. जहगिरीतींल उत्तरेचा नीराथडीचा प्रांत सुपीक व दक्षिणेचा डोंगराळ आहे. पाऊस फार कमी पडतो. हवा उष्ण आहे. ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा ही मुख्य पिंके होत. नीरा व बाणगंगा या मोठ्या नद्या. फलटण गावीं रामनवमीचा मोठा उत्सव होतो. येथें मानभावांचे एक जुने देवस्थान आहे. येथें एक हायस्कूल, दवाखाना व म्युनिसिपालिटीही आहे.
इतिहास- महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणच्या निंबाळकराचें घराणे फार जुनें असून सुमारे सहा सातशें वर्षें तें राज्योपभोग घेत आहे. धारच्या परमार रांजावर दिल्लीच्या सुलतानांनीं पुन्हां पुन्हां हल्ले केले, त्या धामधुमींत निंबराज परमार नांवाचा एक पुरुष दक्षिणेंत फलटणनजीक शंभुमहादेवाच्या रानांत सन १२४४ च्या सुमारास येऊन राहिला. निंबराज ज्या गावीं राहिला त्यास निंबळक आणि त्यावरून त्याच्या वंशास निंबाळकर अशें नाव पडले. निंबराजाच्या वंशजांनी पुढे फलटण हें गाव वसविलें आणि तेथें ते वतन संपादून राहूं लागले. महंमद तुघ्लखाच्या वेळेस ह्यांस 'नाईक' हा किताब व फलटणची देशमुखी मिळाली. पुढें आदिलशाहींत निंबाळकराचें महत्त्व विशेष वाढलें. निंबराजापासून चवदावा पुरुष वणंगपाळ उर्फ जगपाळराव म्हणून झाला, त्याच्या पूर्वीची माहिती उपलब्ध नाहीं.
जगपाळराव हा शूर व फौजबंद होता. स.१५६९ च्या सुमारास तो फटलणचा कारभार पाहूं लागला.हिंगणी बेरडीचे भोंसले दरसाल चैत्रांत शंभुमहादेवाच्या यात्रोस जात. रस्त्यात त्यांचा मुक्काम फलटणास निंबाळकरांकडे होई. बाबाजी भोंसल्याचे दोघे मुलगे मालोजी व विठोजी हे जगपाळरावाचे समवयीच होते. भोसलें बंधूची इभ्रत, ज्वानी व हिंमत पाहून त्या उभयतांचा ॠणानुबंध वाढला. जगपाळराव आजूबाजूस आपला प्रदेश वाढवीत होता, त्या कामीं त्यास मालोजी व विठोजीचा चांगला उपयोग झाला. असे सांगतात कीं, स.१५९०-९२ च्या सुमारास जगपाळरावाची फौज कोल्हापुरकडील कांहीं प्रांत जिकीत असतां, त्याजवर आदिलशहाची फौज चालून आली. पुढें लढाई झाली, तींत भोसलेबंधूंनीं शौर्य प्रगट करून जगपाळरावाची बाजू संभाळिली. ह्यामुळे त्या उभयतांचा स्नेह वृध्दिंगत झाला.पुढें भोसल्यांचा भाग्योदय झालेला पाहून जगपाळरावानें आपली बहीण मालेजीस दिली. हीच शहाजीची आई दीपाबाई होय. पुढें जगपाळरावाच्या मदतीनें जिजाबाईचे लग्न शहाजीशीं झाले. शहाजीनें निमाजशाहीच्या तर्फेने शहाजहानशीं युद्ध केलें, त्यांत जगपाळरावानें शहाजीस मदत केली. ह्या लढाईंतच जगपाळराव स.१६२९ त अहंमदनगरजवळ मरण पावला.
पश्चात त्याचा प्रौढ मुलगा मुधोजीराव (दुसरा) फलटणचा अधिकारी झाला. त्याला दोन बायका असून वडील बायकोला साबाजीराव व जगदेवराव, आणि धाकटीला बजाजी राव व सईबाई अशीं मुलें होती. ह्या सावत्र मुलांत तंटे लागून ते विकोपास गेले. साबाजी व जगदेव हे दोघे घर सोडून मातुश्रीसह विजापुरास गेले. तेथें दरबारांत खटपट केल्यावर त्यांस दहिगांव व भाळवणी हे दोन गांव स्वतंत्र तोदून मिळले (१६३४). अशा रीतीनें निंबाळकरांच्या तीन स्वतंत्र शाखा झाल्या. ह्या गृहकलहामुळें जहागिरांचे नुकसान झालें. मुधोजीराव आजूबाजूस पुंडावे करूं लागला म्हणून त्यावर आदिलशहाची फौज चालून आली; त्याचा पराभव होऊन, आदिलशहानें त्यास बंडखोर ठरवून सातारच्या किल्ल्यावर कैदेत ठेविलें (स.१६३१). येथें तो सात वर्षें होता. त्या मुदतीत फलटणची जहागीर जप्त होती. मुधोजीनें आपली धाकटी बायको व तिची मुलें बजाजी व सईबाई यांस, आपल्याजवळ बोलावून घेतलें. पुढें शहाजी विजापूरच्या नोकरींत राहिल्यावर त्यानें आपलें वजन खर्च करून मुधोजीची (१६३८) सुटका करविली. ह्या उपकारामुळें मुधाजीनें आपली मुलगी शिवाजीस दिली. (१६३९).
शिवाजीनें पुढें जो स्वतंत्र होण्याचा उपक्रम चालविला त्यास मुधोजीचें साहाय्य होते ही गोष्ट  विजापूरदरबारास खपत नव्हती. शिवाय मुधोजीच्या मनात असे होतें कीं, आपल्या पश्चात फलटणचा कारभार बजाजीस मिळावा. ह्या गोष्टीस त्याचे वडील मुलगे कबूल नव्हते. ते विजापुरची मदत घेऊन मुधोजीवर चालून आले. शिरवळनजीक भोळी येथें लढाई होऊन मुधोजी एका वडाच्या झाडाखाली पुत्राच्या हातून मारला गेला, त्यास बापमारीचा वड असें म्हणतात (इ.स.१६४४). ह्या लढाईंत बजाजीस कैद करून विजापुरास नेलें. तेथे बापाच्या अपराधाबद्दल त्यास जिवें मारण्याची आज्ञा झाली. परंतु आदिलशाहाच्या मुलीनें त्याला बाटवून त्याच्याशीं लग्न केल्याने त्याची शिक्षा रद्द झाली. बजाजी काहीं काळ विजापुरी राहिल्यावर देशमुखीनें फर्मान घेऊन फलटणास आला (१६५१). फलटणास अद्यापि बजाजीची समाधि (घुमट) आहे. त्यास पुढें जिजाबाईनें शुंभुमहादेवाच्या देवळांत प्रायश्चित्त देऊन परत जातींत घेतले आणि त्याचा मुलगा महादजी ह्यास शिवाजीची मुलगी सखूबाई दिली.
इ.स.१६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं गेला तेव्हा बजाजी त्याच्याबरोबर होता. इ.स. १६६५ (नोव्हेंबर) त मोंगल व शिवाजी यांचें संयुक्त सैन्य विजापुरच्या मोहिमेवर निघालें. तेव्हां त्यांनीं प्रथम बजाजीपासून फलटण, व ताथवडयाचा किल्ला घेतला. हीं ठाणीं पुढें १० वर्षांनीं बजाजींनें मोंगलांपासून परत घेतलीं. बजाजीची मदत शिवाजीस गुप्तपणे असे. बजाजीच्या मुसुलमान बायकोस मूल झाल्याचें दिसत नाहीं. हिंदु स्त्री सावित्रीबाई हिला महादजी, मुधोजी व वणगोजी (तिसरा) अशीं मुलें होतीं. महादजी हा शिवाजीचा जांवई असून त्याचा एक सरदार होता. तो बहुश: कर्नाटकाकडे असे. संभाजीला त्याची चांगली मदत झाली. संभाजीचा वध झाल्यावर औरंगझेबानें या नवराबायकोस पकडून ग्वाल्हेरीच्या किल्ल्यावर हयातीपर्यंत कैदेत ठेविलें. शिवाजीनें मोजे वाल्हें (जिल्हा पुणें) येथील पाटिलकी जांवयास आंदण दिली होती. महादजीचा पुत्र बजाजी (दुसरा) हा स. १७७४ पर्यंत हयात होता. महादजीचा धाकटा भाऊ मुधोजी. त्याचा मुलगा बजाजी (तिसरा) यास राजाराम छत्रपतीची मुलगी सावित्रीबाई दिली होती पहिला बजाजी स१६७६ च्या सुमारास वारला त्यावर त्याचा तिसरा पुत्र वणगोजी (१६७६-९३) गादीवर आला; याची विशेष माहिती आढळत नाहीं. त्याच्यानंतर जानोजीस (१६९३-१७४८) गादी मिळाली. हा पेशव्यांस मिळून मिसळून वागे. त्याचा मुलगा मुधोजी (तिसरा-१७४८-६५) यानें (तिस-या) मालोजांस दत्तक घेतलें. मुधोजीच्या पश्चात दत्तकाबद्दल भांडण होऊन, सखारामबापू यांच्या सल्ल्यानें पेशव्यानीं फलटणास जप्ती पाठविली. त्या वेळीं मुधोजीच्या सगुणाबाई नांवाच्या स्त्रीनें जप्तीवाल्यांशी लढाई केली तेव्हा पेशव्यानीं जहागीर जप्त करून ती मुधोजी बिन बजाजी एका भाऊबंदाकडे चालविली. बाई त्राग्यानें ६ वर्षें बालेघाटी जाऊन राहिली. पुढें जेजुरीस पुन्हां दत्तकाची चौकशी होऊन व पेशव्यानां लाख रुपये नजर देऊन मालोजीनें जहागिरीचा ताबा मिळविला (१७७४). मालोजी हा पेशव्यांबरोबर चाकरीस असे व जहागिरीचा कारभार सगुणाबाई करीत असें. या घराण्यांत ही बाई फार प्रख्यात झाली. मालोजी हा कर्नाटकांत हरिपंततात्याच्याबरोबर असतां वाख्यानें मेला (१७७७). त्यानें जानराव यास दत्तक घेतलें होतें. जानराव हा बापाप्रमाणेंच पेशव्यांच्या सैन्यांत असे व सगुणाबाईच जहागिरीचा कारभार पाही. ती स.१७९१ त वारल्यावर, जानराव स्वत: कारभार पाहूं लागला. तो स. १८२५त वारला. त्यावर त्याची बायको साहेबजीबाई हिनें स.१८५३ पर्यंत कारभार केला. तिनें मुधोजीराव बापूसाहेब यांनां १८४० त दत्तक घेतलें. त्यानां स. १८६० त संस्थानचा अधिकार मिळाला. त्यानीं पुष्कळ वर्षें राज्य केलें. त्यानीं संस्थानांत ब-याच सुधारणा केल्या. फलटणास पाणीपुरवठयाची योजना केली, मोफत शिक्षण सुरू केलें. हल्ली (१९२५ नोव्हेंबर) त्यांचे दत्तक चिरंजीव श्री मालोजीराव नानासाहेब हे गादीवर आहेत. (इसं; फलटणची हकीकत; वाड-कैफियती; डफ; म. रि. म. वि. २)

संदर्भ : http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-29/10086-2013-03-01-12-24-06

---|| उस्मानाबाद राजे निंबाळकर ||---

छत्रपती शिवरायांविषयी संपूर्ण जगभर 
आदराची भावना असून त्याला मराठवाडा अपवाद असण्याचे कारण नाही. मात्र छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अंमल आपल्या परिसरावर होता का? याविषयी सर्वांच्याच मनात साशंकता असते. मात्र मराठवाड्यासारख्या दूरच्या भागात छत्रपती शाहूंनी उस्मानाबादच्या राजे निंबाळकर घराण्याला दिलेल्या सनदेची अस्सल प्रत सापडल्याने तुळजापूर परिसरावरही स्वराज्याचा अंमल होता हे यावरून सिद्ध झाल्याने त्या परिसरातील लोकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.  मराठवाड्यासारख्या दुर्लक्षित भागामध्ये अनेक अस्सल कागदपत्रे दडलेली आहेत. अनेक कागदपत्रे आता जिर्ण अवस्थेत असल्याने ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ती बाहेर काढून त्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे, अन्यथा कालौघात ती नामशेष होऊन या परिसराचा इतिहास काळाच्या पडद्याआड जाईल.  मराठवाड्याचा इतिहास पाहात असताना या ठिकाणी नेहमीच मराठ्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे  सर्वसामान्यांची एक भूमिका आहे की, आपण कायमच मुस्लिम सत्तेच्या आधिपत्याखाली राहिलो आहोत. परंतु संशोधनातून आता ही मानसिकता बदलणे सोपे जाणार  आहे. फक्त उस्मानाबादसारख्या गावातून जर अनेक अशाप्रकारची कागदपत्रे उपलब्ध होत असतील तर इतरही अनेक घराण्यांकडे याची पुनरावृत्ती होऊ शकते. उपलब्ध झालेल्या कागदपत्रांत छत्रपती शाहू महाराज, महादजी शिंदेंचे पुत्र दौलतराव यांची अस्सल दानपत्रे उपलब्ध  आहेत. ही सर्व कागदपत्रे ही उस्मानाबादच्या राजे निंबाळकर घराण्याकडे सापडली असून या घराण्यातील कृष्णराव निंबाळकर धाराशिवकर हे निजामाबरोबर मराठ्यांनी केलेल्या युद्धात उस्मानाबाद या ठिकाणी ठार झाल्याचे रियासतीत नमूद करण्यात आलेले आहे. यापलीकडे या घराण्याचा इतिहास उपलब्ध होत नाही. परंतु सापडलेल्या अस्सल कागदपत्रांत अनेक कागदपत्रे अशी आहेत की, ती मराठ्यांचा इतिहास बदलू शकतील. कारण या घराण्याचे संबंध थेट छत्रपती शाहूंबरोबर होते. याशिवाय शाहूंनी आपले मानसपुत्र मानलेल्या अक्कलकोटच्या भोसले घराण्याबरोबर उस्मानाबादच्या निंबाळकरांचे विवाहसंबंध जोडलेले आहेत. याचबरोबर काही मजहरही सापडले आहेत ज्यामुळे उस्मानाबादच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यास मदत होणार आहे.  राजे निंबाळकर घराण्याचा पूर्वेतिहास  उस्मानाबाद (धाराशिव) शहराला प्राचिन इतिहास असून या ठिकाणी असलेल्या धाराशिव आणि चांमर लेण्यावरून हे स्पष्ट होते. याचबरोबर प्राचिन कालखंडात व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले तगर किंवा तेर हे गाव उस्मानाबादपासून फक्त २० ते २२ कि.मी.वर असल्याने उस्मानाबादवर सातवाहन, राष्ट्रकूट यासारख्या पराक्रमी घराण्याची सत्ता असल्याचे दिसून येते. कारण राष्ट्रकुटांच्या काळातच येथील लेण्यांचे काम झालेले आहे. आज या लेण्या धाराशिव लेण्या या नावाने प्रसिद्ध असून त्या अतिशय चांगल्या अवस्थेत असून प्राचिन इतिहासाच्या त्या साक्षीदार आहेत.  मध्ययुगीन कालखंडात हा परिसर अहमदनगरचा 
निजाम, विजापूरचा आदिलशहा तसेच काही कालखंडापर्यंत मोगलांच्या ताब्यात होता. पुढे इ.स. १७२४ नंतर उस्मानाबादचा परिसर हा हैदराबादच्या निजाम राजवटीखाली गेला. पुढे स्वातंत्र्यापर्यंत हैदराबादच्या निजामाने आपले वर्चस्व ठेवले. या राजकीय समीकरणात उस्मानाबादच्या निंबाळकरांचा इतिहास शोधल्यास हे घराणे नगरच्या निजामशाहीपासून शिपाईगिरीवर असावे. कारण निंबाळकर घराण्यात पूर्वीपासूनच राजे ही उपाधी लावल्याचे त्यांच्याकडे सापडलेल्या वंशावळीवरून दिसून येते. 
निंबाळकर घराण्याचा मूळ पुरुष हा यमाजी असल्याचे वंशावळीवरून तसेच त्यांच्या घराण्यातून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट होत असले तरी यमाजीच्याही अगोदर  रघुनाथराव नावाचा निंबाळकर घराण्यातील एक पुरुष जहांगिरच्या फौजेत असल्याचे एका पोथीत सापडलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. मात्र रघुनाथरावांविषयी पोथीशिवाय अन्यत्र माहिती उपलब्ध नाही. त्याच वेळी यमाजीचे एक अस्सल चित्र उपलब्ध असून त्यात यमाजीचा राजेशाही पोषाख, घोडा आणि त्यांच्यावर धरलेले अब्दागिरी तसेच मोरचेल यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज येतो. वंशावळीत मात्र यमाजी हेच आद्य पुरुष असल्याचे स्पष्ट होत आहे, कारण वंशावळीत मूळ पुरुषात त्यांचे नाव आद्य पुरुषात दाखविण्यात आलेले आहे.  राधाबार्इंना दिलेली शाहूंची सनद  राजे निंबाळकर घराण्यात यमाजींना त्यांचा आद्य पुरुष मानून जवळपास सर्वच घरांमध्ये त्यांचा फोटो असला तरी अद्यापपर्यंत त्यांच्याविषयी कुठलेही कागदपत्र  उपलब्ध झालेले नाही. तरी परंतु त्यांच्या फोटोचे बारकाईने निरीक्षण केले असता ते कोणी तरी मोठे पुरुष असावेत हे स्पष्ट होते. त्या कालखंडातील घोड्यावरील सवारी, सोबत सेवक आणि त्यांच्यावर धरण्यात आलेले मोरचेल यावरून हे सिद्ध होते. काळानुरूप कागदपत्रांचा अपव्यय आणि नवीन पिढीत होणारे बदल यामुळे बरीच अस्सल साधने नष्ट पावलेली असतात. तरीपण काही मौखिक माहितीच्या आधारे इतिहासावर प्रकाश टाकण्यास मदत होत असते. त्यानुसार उस्मानाबादच्या निंबाळकर घराण्यात नेहमीच एक चर्चा कायम ऐकायला मिळत असते की, छत्रपती शिवरायांच्या घरातील एक मुलगी आपल्या घराण्यात देण्यात आलेली आहे. यापलीकडे अन्य कुठलाही पुरावा उपलब्ध होत नव्हता. सुदैवाने मला या घराण्यातील राधाबार्इंना छत्रपती शाहूंनी दिलेली वैयक्तिक स्वरूपातील अस्सल स्वरूपातील सनद येथील श्रीमती पुष्पाबाई विजयसिंह राजे निंबाळकरांकडे सापडल्याने उस्मानाबादच्या पर्यायाने मराठ्यांच्या इतिहासाला नवीन संदर्भ प्राप्त झाला आहे. 
त्यानुसार इ.स. १७२० साली छत्रपती शाहू महाराजांनी उस्मानाबादच्या राजे निंबाळकर घराण्यातील राधाबार्इंना चोळी-बांगडीकरिता उस्मानाबादची जहागिरी दिल्याचे यात स्पष्ट करण्यात आलेले आहे. या सनदेवर शाहू आणि त्यांचा पेशवा बाळाजी विश्वनाथचा  शिक्का आहे. अस्सल स्वरूपातील या सनदेचा विचार केल्यास निंबाळकर घराण्यातील या चर्चेला पुष्टी मिळते. कारण राधाबाई कोण? याविषयी इतर कुठल्याही कागदपत्रात याचा संदर्भ लागत नाही. त्याचबरोबर तत्कालीन धराशिव परिसराची जहांगिरी दिल्याने या परिसरावर मराठ्यांची सत्ता होती का? याविषयी माहिती घ्यावी लागणार आहे. आणि जर सत्ता नसेल तर किमान मराठ्यांकडून या परिसरातून चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांकडे असावेत हे स्पष्ट होत आहे.  उस्मानाबादच्या निंबाळकरांचे इतिहासातील स्थान  राधाबार्इंच्या सनदेशिवाय अन्य विशेष माहिती उपलब्ध होत नसली तरी या सनदेवरून उस्मानाबादचे निंबाळकर हे मराठ्यांकडून लढत असल्याचे स्पष्ट होते. पुढे पानिपत युद्धानंतर मराठ्यांची ताकद क्षीण झाली. तर याच वेळी हैदराबादच्या निजामाने मराठ्यांच्या प्रांतावर आक्रमण करतानाच त्यांचे एक-एक सरदारही फोडण्यास सुरुवात केली. या वेळी निजामाचा सरदार 
लाला ब्रिजनाथ याने मराठ्यांच्या प्रांतावर आक्रमण करून नळदुर्ग, गुंजोटी, अक्कलकोट हे भाग घेऊन उस्मानाबादवर आक्रमण केले. तेव्हा मराठ्यांकडील वैरागचे मकरंद आणि धाराशिवचे कृष्णराव असे दोन्ही निंबाळकर निजामाला जाऊन मिळाले. लाला ब्रिजनाथ हा एक-एक प्रांत घेत पुढे जात असताना धाराशिव या ठिकाणी मराठे आणि निजाम यांच्यात युद्ध झाले. या वेळी मराठ्यांविरुद्ध लढताना कृष्णराव निंबाळकर धाराशिवकर हे भाल्याची जखम लागून ठार झाले. या वेळी त्यांच्या पत्नी आनंदीबाई सती गेल्या. कपिलधार परिसरात जी मोठी समाधी आहे, ती याच आनंदीबार्इंची आहे. पेशवे कालखंडात उस्मानाबादच्या निंबाळकर घराण्याने बराच नावलौकिक मिळवलेला आहे. कारण कृष्णरावांचा मुलगा आनंदराव हा पुढे निजामाशी लढताना एका तहाप्रसंगी मुरादखान, हणमंतराव निंबाळकर यांच्यासोबत तहात भाग घेताना दिसून येतो.  याचबरोबर कृष्णरावांची एक मुलगी म्हैसळाबाई यांचा विवाह अक्कलकोट संस्थानाचे राजे मालोजी ऊर्फ बाबासाहेब (१८०३-१८२८) यांच्यासोबत झालेला होता. पुढे बाबासाहेबांचे पुत्र आप्पासाहेब (१८२२-१८५७) यांना कृष्णराव निंबाळकरांचा नातू नरसिंगाची  मुलगी अहिल्याबाई दिलेली होती. त्यामुळे कृष्णरावांविषयी बरीच माहिती उपलब्ध होत असतानाच तांदुळजा येथील बावणे घराण्याकडे सापडलेल्या कागदपत्रांत कृष्णरावांचा एक फोटोही सापडला असून फोटोंच्या निरीक्षणावरून त्यांचे स्थान निश्चित करता येऊ शकते. कारण याच फोटोत त्यांच्याकडील घोड्याच्या किमतीही दिलेल्या आहेत. त्यामुळे कृष्णराव निंबाळकर हे या घराण्यातील सर्वांत पराक्रमी आणि आपल्या कर्तृत्वाने नावारूपाला आलेले पुरुष असावेत हे स्पष्ट आहे. त्यातच तत्कालीन कालखंडातील अक्कलकोटचे भोसले हे सातारच्या छत्रपतींचे मानसपुत्र आणि या घराण्यात उस्मानाबादच्या निंबाळकरांचे नातेसंबंध असल्याने त्यांचा सामाजिक दर्जाही सांगता येतो.  निंबाळकर घराण्याची माहिती देणारा एक  मजहरही उपलब्ध झालेला असून त्यात उस्मानाबादच्या जहागिरीविषयी माहिती दिलेली आहे. या पत्रात संपूर्ण उस्मानाबादचा मोकासा आनंदीबार्इंच्या नावाने देण्यात आलेला असून यात संताजी आणि रघुनाथराव राजे निंबाळकरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर या मजहरावर बारा बलुतेदारांच्या निशाणीसह सह्या आहेत. त्याचबरोबर पेशव्यांच्या आणखी एका पत्रावरून आनंदीबाई निंबाळकर (दुस-या) यांच्याकडे तुळजापूर परिसराचा मोकासा असल्याचे स्पष्ट होते.  त्यानंतर याच निंबाळकर घराण्याकडे महादजी शिंदेंचे पुत्र दौलतराव याने दिलेले पत्र उपलब्ध झाले असून त्यात फकिरजी निंबाळकरांनी आपली जहागिरीची व्यवस्था करण्यासाठी काळेंची नियुक्ती करण्यात आलेली होती. पुढे हा काळे ठरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करताना दिसून येतो. त्यातूनच उस्मानाबादच्या जहागिरीत फकिरजी निंबाळकर आणि काळे यांच्या दरम्यान तंटा उपस्थित झालेला असून त्यात दौलतरावाने निंबाळकरांची बाजू घेतलेली आहे. खरे तर या वादात दौलतरावाने बाजू घेताना या परिसरावर शिंदे घराण्याचा संबंध कशारीतीने आला हे स्पष्ट होत नसले तरी प्रथमच उस्मानाबादशी शिंदे घराण्याचा संबंध दर्शविणारा कागद सापडलेला आहे. हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. तर सुरुवातीपासूनच निंबाळकर घराण्यात मालमत्तेवरूनचे वाद मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने यातून या घराण्याचे अनेक कागद सापडतात. अशारीतीने उस्मानाबादसारख्या दुर्लक्षित भागात छत्रपती शाहू, पेशवे आणि दौलतराव शिंदे यांच्या अस्सल स्वरूपातील सनदा सापडल्याने इतिहासातील उस्मानाबादचे स्थान निश्चित करता येते. मा. मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, ओमराजे निंबाळकर, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर हे याच घराण्यातील असून मा. विलासराव देशमुख यांच्या आत्या श्रीमती पुष्पातार्इंचा विवाह निंबाळकर घराण्यात झालेला आहे. अशारीतीने या परिसरावर दोनशे वर्षे निजामाची सत्ता असली तरी उस्मानाबादमध्ये छत्रपती शिवरायांच्या नातवाने दिलेला कागद सापडल्याने मराठवाड्याच्या इतिहासात छत्रपतींचा संबंध स्पष्ट होतो. 
डॉ. सतीश कदम 
मोबा. ९४२२६ ५००४४

शुक्रवार, १८ मे, २०१२

---|| पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर ||---



अरे भाई ये सिवा कब हात आयेगा खुदा जाने. बहलोल खानच्या सैन्यातील माहूत एकमेकांशी बोलत गजराजाला पाणी पाजण्यास न्हेत होते. अचानक आजूबाजूच्या झाडाफांदीवरील पाखरे उडाली इकडे तिकडे नजर फिरवताच लक्षात आले की मराठ्यांनी चारही बाजूने आपणास मराठ्यांनी घेरल्याचे लक्षात आल्यावर ती माहूत मंडळी जोरजोरात बोंबलू लागली. साऱ्या सैन्याचे लक्ष वेधू लागली. झाडांच्या आडगळीतून आलेल्या बाणांनी त्यांच्या नऱ्हडीचाच घोट घेतला

शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्यामुळे हडबडलेल्या विजापुरी सल्तनतीने राजांवर बहलोलखान सारखा खासा पठाण धाडला होता परंतु अष्टावधानी असणाऱ्या बहीर्जींच्या खबरी मंडळींनी ही बातमी वाऱ्याच्या वेगाने महाराजां पावेतो पोहचवली. आणि त्यांच्या बंदोबास्तालाच प्रतापरावांसोबत १५ हजार फौज फाटा धाडला होता आपल्या परिने योजना आखून खानास जेरीस आणावे. ही शिवरायांची ताकीदच होती.

अचानक कोसळलेल्या संकटामुळे खानाची फौज थोडी घाबरली. परंतू लगेचच त्यांनी लढाईची सिद्धता दाखविली. लवकरच दोन्ही कडचे घोडदळ पायदळ एकमेकांवर आदळू लागले. एकच कापाकापी सुरु झाली.

सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, विसोजी बल्लाळ, व आनंदराव असे मराठी रियासतीचे अनुभवी सरदार अंगावर येणाऱ्या प्रत्येक गनिमास आपल्या तरवारीने पाणी पाजत होते. यात तरणे वीर तरी मागे राहतीलच कसे रुपाजी भोसले. सोमाजी मोहिते. सिधोजी निंबाळकर हे देखील तिखट हत्यार चालवीत होते. पुढच्या फळीत लढणारे सिधोजी निबांळकर मोठ्या त्वेषाने दुष्मनावर तुटून पडत होते.

समोर येणाऱ्यांची खेर नव्हती. नंतर बहलोलखानाने आपल्या भोवती झालेली कोंडी फोडण्यासाठी त्याच्या फौजेत असणाऱ्या मदमस्त हत्तींना पुढे केले हे गजराज. मदोन्मत्त होऊन अनेक मराठ्यांना आपल्या पायदळी तुडवत होते. आकांत माजवत होते. अशा पिसाळळलेल्या जनावरास सिधोजींनी माहुता करवी जेरीस आणले. सायंकाळी सिधोजी निंबाळकरांनी तो हत्ती हस्तगत केला. आणि महाराजांकडे चालविला.


याच हत्तीच्या तोडीच्या कामामुळे राजांनी खुश होऊन राजेंनी सिधोजींना सैन्यात थोडी बढती दिली असेलच. साधनांच्या आभावी जास्त माहिती मिळत नाही बेहलोलखाना नंतर सिधोजींचा उल्लेख येतो तो जालानापुरीच्या लुटीत

राजांच्या आयुष्यातील शेवटची स्वारी म्हणजे जालण्याची स्वारी ४ दिवस राजेंनी पेठा मारिल्या, शहर लुटून फन्ना केले. जडजवाहीर कापड घोडे हत्ती उंट फस्त केले. जालना म्हणजे मोगलाईतील महत्वाचे शहर ते मारिल्या मुळे
मोगल संतप्त जाहले. मोगली फौज घेऊन रणमस्त खान चालून आला त्याची गाठ महाराजांच्या सैन्याच्या मागच्या तुकडीशी संगमनेर जवळ पडली महाराजांच्या लष्करातील संताजी घोरपडे आणि पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर

हे या पाच हजाराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व करीत होते. अखेर लवकर जेरीस येतील ते कसले मराठे आणि कसला मराठी बाणा कडवट प्रतिकार देत सिधोजींनी आपल्या ५ हजार सैन्यानिशी रणमस्तखानास सलग ३ दिवस झुंजवत ठेवला अखेर याच युद्धभूमीत सिधोजी निंबाळकर यांस वीरमरण आले.

धन्य ते मावळे धन्य त्यांची स्वामीनिष्ठा.........

Source -
Shivaji and his time - Jadunath Sarkar
सेनापती संताजी घोरपडे - जयसिंगराव पवार
शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख
सभासदाची बखर - कृष्णाजी अनंत सभासद
मराठी रियासत - गो. स. सरदेसाई
संदर्भ :  http://abhishekkumbhar.blogspot.in/2011/09/blog-post_29.html

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

---|| संभाजींच्या मातोश्री - सईबाई ||----

सईबाई भोसले (निंबाळकर) (मृत्यू :- ५ सप्टेंबर १६५९.)

छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी. धर्मवीर संभाजी राजांच्या मातोश्री.


जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रिय सून .

सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत्या ,
परंतु संभू राजे लहान असतानाच सईबाईंचा मृत्यू झाला.

सईबाईंचे वडील माधोजीराव निंबाळकर होते.
छत्रपती शिवरायांबरोबर सईबाईंचा विवाह झाला
तेंव्हा त्या फक्त ७ वर्ष्याचा होत्या आणि शिवराय ११ वर्ष्यांचे होते.
त्यांच्या चेहऱ्याचा रंग गव्हाळ होता .
त्या शिवरायांच्या स्फूर्तीस्थान आणि सामर्थ्यवान अश्या पत्नीहोत्या.

त्यांच्या मृत्युनंतर शिवरायांना त्यांची भरपूर उणीव भासली .
संभू राजांना पाहताना शिवरायान पुढे सईबाईंची आभास मूर्ती उभी राहत असे .

मृत्यू समयी शिवरायांच्या तोंडून शेवटचा शब्द "सई" निघाला होता.
सईबाईंना संभाजींच्या अगोदर तीन मुली होत्या .

त्यातील एका कन्येचा (" सखुबाई") विवाह सईबाईंच्या भावाचा मुलगा बजाजी नाईक निंबाळकर यांच्याशी झाला .

संभाजींचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती, संभू राजे २ वर्ष्यांचे असतानाच आपल्या मातोश्रीनपासून दुरावले होते. पुढे संभू राजांना त्यांच्या आज्जी व शिरायांच्या मातोश्री " जिजाउंनी " घडवले.

-|| बजाजी निंबाळकरांचे धर्मांतर – एक दंतकथा ! ||-

शिवकालात फलटण संस्थान हे मोठे मातब्बर.ह्या संस्थानाचे शिवकाळातील अधिपती बजाजीराजे नाईक निंबाळकर हे तो शिवाजी महाराजांचे व्याही. फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्यासबंधी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. ती अशी की -

“विजापुरच्या आदिलशहाने त्यास विजापुरला धरून नेले व त्याचे धर्मांतर केले, नंतर ते देशी परतले व आपल्या केलेल्या कर्मांचा त्याना पश्चाताप झाला, बजाजीराव ह्यांची छत्रपती शिवाजी महाराजानी शिखर शिंगणापूर येथे शुद्धि करून घेतली, त्यानंतर काही दिवसानी बजाजीचा मुलगा महादजी निंबाळकर यास शिवाजी महाराजानी आपली मुलगी दिली.”

सत्य असे की धर्मांतर झाले असा कुठेही उल्लेख नाही आणि जर बजाजीराव यांचे धर्मांतर झालेच असेल तर मग त्यांचे ” मुसलमान “ नाव काय ?

हे आजतागायत कोणीही देत नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काही सुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे १६४२ मधे मुसलमान झाले असे म्हणतात, त्या हिशोबे त्याचे १६४२ ते १६५१ या कालखंडामध्ये जर धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत नाहीच तर याच दरम्यान त्यांचा उल्लेख हा हिन्दू म्हणूनच केला जातोय, ते ही चक्क समकालीन कागद पत्रामंधे, पाहूया जरा हे समकालीन पुरावे -

१) शिवभारत हे अस्सल साधन आज उपलब्ध आहे, पहिले त्याचा संदर्भ पाहूया -
शिवभारत – अध्याय १३- श्लोक १०
घांटीको (घाटगे) मत्तराजश्च कुलीशोपमसायक: |
तथा फलस्थान (फलटण) पतिबलवान बाजनायक: ||

या मधे कविन्द्र परमानंद हे बजाजीराजेंचा उल्लेख ” बाजनायक ” असा करतात, शिवभारता मधे येणारा हा उल्लेख १६४८ मधल्या प्रसंगाचा आहे जेव्हा स्वराज्यावर फतहखानाचे संकट आले आहे. कविन्द्र परमानंद यांनी बजाजीस फलटणचा अधिपती आणि बाजनायक असे म्हटले आहे, श्लोकामध्ये जर बजाजीराजांचे धर्मांतर झाले असेल तर त्यांच्या यावनी नामाचा उल्लेख अजिबात नाही, शिवभारत हे विश्वासार्ह आहे कारण ते समकालीन आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे क्रमप्राप्त आहे.कविन्द्र परमानंद हे महाराजांचा निकटवर्तीय आहेत.तेव्हा हा पुरावा निश्चित विश्वासपात्र आहे. 
२) एक छोटी कैफियत आहे निंबाळकर घराण्याची जी १८२२ मधे लिहली गेली, ती बापूसाहेब निंबाळकर यांच्या दफ्तरात सापडली, त्यात एक उल्लेख आहे की बजाजीरावांनी १६५१ मधे बेगम (विजापूरची बडी बेगम ?) हिच्याकडून फलटणची सनद घेतली.इथेही बजाजीरावांचे नाव हिंदूच तसेच त्यांच्या धर्मांतराचा काहीही उल्लेख नाही.

३) बजाजीराजे निंबाळकर १६५९ मधे अफजलखान स्वारीच्या वेळी फलटण मधे होते, त्यास अफजलखान याने पकडले व त्याची सुंता करून ठार मारण्याची धमकी दिली त्यावेळी अफजलखानाकडील मराठी सरदार ” नाइकजीराजे पांढरे ” यांच्या मध्यस्थिने बजाजीराजे निंबाळकर यांच्याकडून ६० हजार होनांची खंडणी घेउन अफजलखानाने त्यांना सोडले.

ह्या संदर्भातील अस्सल पत्र खाली देत आहोत -

” धनकोनाम जयचंदीभाई व जमामाव बाबानभाई मुक्काम मलवडी यास रिणकोनाम बजाजी नाइक निंबाळकर व सावित्रीबाई महादजी नाइक निंबाळकर देशमुख परगणे फलटण…कारणे लिहून दिला कर्जकतबा ऐसाजे बदल खान आजम आबदलाखान ( अफजलखान ) यासी पातशहानी साहेबी शिवाजी राजेवारी मसलत केलि. ते वख्ति आबदलाखान कुचावर कुच करून मलवडी उतरले, ते वख्ति अम्हाबद्दल शिवाजी राजे यानि नाइकजी राजेस ( नाइकजीराजे पांढरे) बहुत प्रकारे कागद लिहला होता आम्हास दस्त करून गल्यात तोफ घालून सुनता करून हत्तीच्या पायाखाले घालून मारावे, तो नाइकजी राजे यांनी बहुत काही आडमुड होउन आबदलाखानास अर्ज केल्यावरी साठी हजरावारी करार करून, होन साठी हजारावर दरम्यान नाइकजी राजे पांढरे जमान होउन सोडिवले

साक्षीदार – रतनजी माने देशमुख कसबे मह्सवड, मलजी राजे पांढरे, रविराव ढ़ोणे, जाधवराव देशमुख दौलताबाद, धूलाजी राजे सडगे, देवजी राजे धायगुड़े, तानाजी राजे काकरे, दत्ताजी माने देशमुख कर्यात मलवडी, विठ्ठल भालेरावजी दीवाण निरत नाइकजी राजे पांढरे ”
( शिवकालीन पत्रसारसंग्रह – खंड – २ – लेख.क्र. – १७९७ )

जर इ. स . १६५९ मधे अफजलखान बजाजीराजे नाइक यांची सुनता करायची धमकी देतो तर ह्यावरून काय सिद्ध होते की – १६५९ च्या अगोदर बजाजी निंबाळकर यांची सुनता झालीच नव्हती, कारण जर ती झालेली असती तर अफजलखानाने तशी धमकी बजाजीस दिलीच नसती.

सारांश बजाजीराजे निंबाळकर हे मुसलमान झाले होते ह्या विधानाला काहीही पुरावा नाही.

|| लेखन सीमा ||

                                                                                       --|| विशाल खुळे  ||--

संदर्भ : http://raigad.wordpress.com या ब्लॉग वरून

माळशिरस येथील सखुबाई महादजी निंबाळकर यांची दुर्लक्षित भग्न समाधी

 अकलूजचे अविनाश जाधव यांनी ओर्कुटवरती  लिहिलेल्लीहिलेला लेख
२४ सप्टेंबरला मी सत्यशोधक समाज्याच्या १३७ व्या वर्धापन दिनासाठी " महात्मा फुलेवाडा , पुणे " येथे सत्यशोधक समाज्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो...
तेथे बाबा आढाव यांनी " पुरोगामी सत्यशोधक " हे त्रेमासीख प्रकाशित केले त्यात अकलूज येथील सखुबाई ( सकवार ) महादजी निंबाळकर यांची भग्न समाधी बाबत प्रबोधन पर लेख होता या अंकाचे मुखपृष्ठच या समाधीच्या फोटोने आहे..



बाबांनी ( बाबा आढाव ) सखुबाई महादजी निंबाळकर यांचा इतिहास सांगितला .... हा इतिहास आणि ती भग्न समाधी पाहून मन सुन्न झाले..

प्रथमच मराठा असल्याची लाज वाटली...

त्या नंतर अंकाच्या चार प्रती घेऊन घरी गेलो... झोप काही लागली नाही...

अकलूजचे जेष्ठ नेते मोहिते पाटील यांना पत्र लिहिले...
पण राजकीय परिस्थिती पाहता हे काम सामाजिक लोकांनाच करावे लागेल हे लक्षात आले...

चार दोन थोरा मोठ्यांना भेटलो... पण त्यांना इतर बरेच व्याप असल्याने .. फार कोणी काळजी पूर्वक लक्ष दिले नाही ...!!!!!!

बाबा आढावाना पुन्हा व्यक्तीशः भेटायचे ठरवले..
बाबा आढावानी आनदाने पाठींबा दिला ....

तुम्ही तरुण मंडलीनीच हे काम आता पाहायला हवे " अकलूज परिसरातील सर्व सामाजिक शिवप्रेमींना एकत्र करून या दुर्लक्षित शिवकन्येच्या समाधीचा जीर्णोद्धार करा... मी सोबत आहेच .. " असा मोलाचा पाठींबा त्यांनी दिला...

त्या नंतर शाहीर राजेंद्र कांबळे यांची भेट घेतली त्यांनी हि पुढाकार घेण्याचा शब्द दिला...
पंढरपुरचे युवानेते अमरजित पाटील यांनीही सक्रीय पाठींबा दिला आहे.

या नंतर या समाधीचे संशोधक गोपाळराव देशमुख यांना त्यांचे पंढरपुरचे घरी भेटायला गेलो त्यांनी फारच तळमळीने सारी माहिती दिली....

ती मी येथे लिहिणार आहेच ...

 या नंतर मी फलटणच्या शाही समाधीला भेट दिली आणि माळशिरसला जाऊन सखुबाई महादजी निंबाळकर यांची दुर्लक्षित भग्न समाधी हि पहिली..


एकीकडे संगमरवरी शाही निंबालकरी समाध्या आणि दुसरीकडे त्याच घरात दिलेल्या शिवकन्या सखुबाई निंबाळकर यांची भग्न समाधी पाहून


आज हि ब्राह्मणी मानसिकता मराठा समाज्याच्या ऐतिहासिक वारशांचे किती नुकसान करत आहे याची तीव्र जाणीव झाली..
.
या सामाजिक क्रांतीला दडपण्यासाठी त्या समाधीला वाळीत टाकावे !!!!!!!!!!!!!! एवढे दुर्लक्षित करावे कि तेथे अक्षरशः हागणदारी व्हावी !!!!!!!!!!!!!!!!!


वेड्या बाबळीने वेढलेल्या या जेष्ठ शिवकन्येच्या समाधीचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे .......


हा ऐतिहासिक वारसा असा भग्न होत असताना आपण शिवप्रेमी गप्प बसूच कसे शकतो ????????????


या वेड्या बाबळीने वेढलेल्या भग्न समाधीचा एकही काटा जर आमच्या मनाला टोचत नसेल तर आमची मने पुन्हा एकदा तपासावी लागतील...

आपण काय करू शकतो......

१. आधी येथे प्रातःविधीला बसणाऱ्या लोकांचे प्रबोधन करावे लागेल कि बाबानो हे थांबवा ...
२. या साठी प्रथम त्या जागेच्या मालकांना या समाधीचे महत्व पटून द्यावे लागेल ते काम मी १५ डिसेंबर नंतर करणार आहे..
३. जागेचे मालक हे शिव प्रेमी तसेच सामाजिक जाणीव असणारे आहेत त्या मुळे फार त्रास होणार नाही अशी अपेक्षा आहे.
४. या नंतर त्या जागेवर तर काम्पौंद करावे लागेल आणि एक मोठा माहिती फलक लावावा लागेल..
५. छोटासा प्रबोधन पर कार्यक्रम ठेवावा लागेल.... जन जागृती करावी लागेल..
६. त्या नंतर या जागेची स्वच्छता करावी लागेल.
७. या नंतर जीर्णोद्धारासाठी निधी उभारावा लागेल...
८. येथून पुढे जीर्णोद्धाराची खरी सुरुवाट होईल....

यासाठी समाधी परिसरातील शिवप्रेमींना सहभागी होण्यासाठी प्रबोधन करायचे आहे ते मी करत आहेच ....

संदर्भ  : http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=12792978&tid=5540033853785670369&start=1 
----------|| शिवपुत्र संभाजी राजे ||--------------
कितीही आली संकटे ,
तटस्तपने लढू ,
छत्रपती शिवरायांच्या या
पावन शिवभूमीत,
शंभू राजांप्रमाणे घडू .
शिवचरित्रा मधून संस्कार,
देवू नव्या पिढीला ,
घडवू प्रत्येक मावळा ,
शंभू चरित्रातून .
---|| शंभू राजांना त्रिवार मुजरा ||---
===========================================


------------------|| राजे ||------------------------
--------|| होय आम्ही अजुन जिवंत आहोत ||-----------
"आचार, विचारातुनी अजूनही जपतो आमचा मराठी बाणा,
अजूनही जिवंत आहेत अमुच्या पुर्वज्यांच्या पाउलखुणा."
========================================
===